जालन्यात पोलिसांना लाठीचार्जचा आदेश नेमका कोणता नेत्याने दिला | Jalna Maratha Andolan News | Manoj Jarane Patil Latest News
जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी या गावात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये इथे अनेक मराठा आंदोलक जखमी झाले. पण नेमकं काय घडलं काल या अंतरवली सराटी गावामध्ये ? पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज नेमका का केला? तसेच पोलिसांना आदेश देणारा नेता नेमका कोण आहे? या लाठीचार्ज आडून काय राजकारण शिजतंय का ? चला सगळंच डिटेलमध्ये पाहूयात.

( Jalna Maratha Andolan News | Manoj Jarane Patil Latest News )
सगळ्यात आधी जालना जिल्ह्यात नेमकं काय घडलं ते पाहूयात. तर बघा, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अंतरवली सराटी म्हणून एक गाव आहे. ज्या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. तिथं गावकरी आणि आसपासच्या गावातील लोकंही जोडली जात होती. २९ ऑगस्टला लोकांनी ते आंदोलन सुरू केलं होतं. पण हे आंदोलन मागं घेण्यात यावं असं तिथल्या प्रशासनाचं म्हणणं होतं. अगदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोनवरून आंदोलकांशी बातचीत केल्याचं समजतंय. पण मनोज जरंगे पाटील आणि आंदोलक मात्र आंदोलनावर ठाम होते. त्याचवेळी डाॅक्टरांनी मनोज जरंगे यांची प्रकृती ठीक नाही. ते पाणी पीत नाहीत थूंकीही गिळत नाहीत त्याबद्दल पोलिसांकडे चिंता व्यक्त केली. आणि यावरूनच हे आंदोलन जरंगेंनी माघारी घ्यावं यासाठी पोलिस घटनास्थळी पोहोचले. अप्पर पोलिस अधीक्षक राहूल खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, बीडचे अप्पर पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले. पण जरंगे पाटील या आंदोलनावर ठाम होते.त्यांनी पोलिसांसमोर काही मागण्या ठेवल्याचंही समजतंय. त्याशिवाय माघार नाही असा निर्धारही व्यक्त केला. पोलिस आले तेव्हा तिथले स्थानिक कार्यकर्ते भाषण करत असल्याचंही समजतंय. पण इतक्यात पोलिसांनी अचानक लाठीचार्ज सुरू करत विनाकारण हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप आता आंदोलकांकडून व्यक्त केला जातोय. यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज तर केलाच पण अश्रुधुराचाही वापर केला. सोबत हवेत गोळीबार करत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला.यामध्ये बरेच आंदोलक गंभीर रित्या जखमी झाले. या लाठीचार्जनंतर झालेल्या दगडफेकीत १५ ते २० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी झाले, असं जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी माहिती दिली. पण यामध्ये अनेक मराठा आंदोलक, स्त्रिया , लहान मुलं यांच्यावरही लाठीहल्ला झाला. वास्तविक असा लाठीहल्ला करणंही शेवटची प्रायोरिटी असते. आणि जर तो झालाच तर कमरेच्या खाली करायचा असतो. पण या लाठीहल्यात अनेक आंदोलकांच्या डोक्याला, हाताला ,डोळ्यांना देखील इजा झाली.
( Jalna Maratha Andolan News | Manoj Jarane Patil Latest News )
आता जखमींवर सध्या वडीगोद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंबड येथील जिल्हा उपरूग्णालया मध्ये उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान गावात तणाव पूर्ण शांतता असल्याचं पोलिसांकडून कळतंय. पण आता संतप्त जमावाने आता या सगळ्या बद्दल शिंदे फडणवीस सरकारला जोरदार घेरलं आहे. उपोषणकर्ते मीडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की आमचं आंदोलन जर शांततेत चालू होतं तर मग लाठीचार्ज करायची गरज काय होती? याबद्दल त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. तिथे उपस्थित महिलांनीही सरकारवर निशाणा साधलाय. त्याबद्दल मीडियाशी बोलताना तिथले पोलिस अधीक्षक तुषार दोशी मात्र असं म्हणाले की आंदोलन स्थळी आधी आंदोलकांनीच दगडफेक केली त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला यामध्ये आंदोलकांसोबतच काही पोलिस ही जखमी झालेत.पण आता यावरून राज्याचं राजकारण रंगू लागलंय. शरद पवार यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत या ठिकाणाला आज भेट देण्याचं ठरवलं आहे.शरद पवार यांनी याबाबतीत असं म्हणलंय की, या गावातलं हे आंदोलन अतिशय शांततेत सुरू होतं. पण आंदोलकांनी त्यांच्या मागण्या समोर ठेवल्यावर पोलिसांनी विनाकारण बळाचा वापर करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. शरद पवार पुढे असंही म्हणतात की, मला अशीही माहिती मिळाली की तिथल्या गावकऱ्यांशी पोलिस बोलत होते की या आंदोलकांच्या मागण्या रास्त आहेत पण आम्हाला हे करण्यावाचून पर्याय नाही. आम्हाला वरून आदेश आहेत. आता लोकांनी यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं आहे.देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल मत व्यक्त केलं आहे, त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली ते म्हणाले की, काही ज्येष्ठ नेते या विषयावर बोलताना दिसतायत पण त्यांनी सांगावं की त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं म्हणून. आम्ही मराठा समाजाला मागे आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकलं पण काही नेत्यांच्या गलथान कारभारामुळे ते सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.यावर ते नक्कीच तोडगा शोधतील.

( Jalna Maratha Andolan News | Manoj Jarane Patil Latest News )
असं म्हणताना , त्यांनी राज्यातील मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन देखील केलं आहे. हा प्रश्न complex आहे. न्यायप्रविष्ट आहे.तो चर्चेतूनच सोडवायला हवा तसेच आम्हाला आंदोलकांच्या जीवाची काळजी आहे. आंदोलकांची प्रकृती खालावली म्हणून पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना रूग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करणे ही सरकारची जबाबदारी आहे, सरकार त्यांना मरायला सोडू शकत नाही. असंही फडणवीस पुढे म्हणाले. पण आता जालना तसेच धुळे सोलापूर रोडवर बस जाळण्यात आल्यात. राज्यात ठिकठिकाणी या घटनेचा तीव्र विरोध केला गेलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करणारे अजून एक कार्यकर्ते योगेश केदार यांनीही गेल्या तीन महिने झालं आझाद मैदानावर ठाण मांडलंय. तुळजापूर ते आझाद मैदान अशी मराठा वनवास यात्रा त्यांनी काढलीय. त्यांचीही मागणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं आशीच आहे. त्यांनी मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिलीय. योगेश केदार म्हणतात की, मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना काही दिवसांपूर्वी फोन केला होता. पण त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मराठा समाजात जन्मलेले हे मुख्यमंत्री आता मराठा समाजाच्या मुळावर उठलेत का असा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का ? मराठा समाजाच्या नादाला कोणीही लागू नये. आता याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपोषण कर्ते मनोज जरंगे यांच्यातील काॅल रेकाॅर्डिंग व्हायरल होतंय. ज्यामध्ये एकनाथ शिंदे मनोज जरंगे पाटील यांना हे आंदोलन मागे घेण्याची विनंती करत आहेत.
( Jalna Maratha Andolan News | Manoj Jarane Patil Latest News )
पण मनोज जरंगे पाटील यांनी ही आंदोलन मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी फेटाळलीय.या काॅलनुसार, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मुख्यमंत्र्यांनी एक समिती गठित केली होती. त्या समितीत यायला मनोज जरंगे यांनी विरोध केला होता. तसेच सर्व मंत्र्यांना समिती बाहेर ठेवून फक्त सचिवांची समिती स्थापन करण्याचीही त्यांनी विनंती केली होती.तशी समिती स्थापन झालीही.हे सगळं मे महिन्यात घडलं होतं . पण तीन महिने लोटूनही या समितीने काही काम केलं नसल्याचा आरोप मनोज जरंगे यांनी लावलाय .त्यावेळेस मी यावर तपशील घेतो ,असं मुख्यमंत्र्यांनी सांगूनही मनोज जरंगे पाटील यांनी माघार घेतली नाही. आता हा विषय अजूनच चिघळणार असं दिसतंय. राज्यभरात मराठा आंदोलक यावरून आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे .विरोधक सरकारवर टीका करत आहेत. तर सरकार विरोधकांवर. पण या सगळ्यात सर्वसामान्य मराठा बांधवांना कोण न्याय देईल हाच खरा प्रश्न असणार आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, हे आंदोलन नेमकं कोणी चिघळवलंय ? पोलिसांच्या आडून मराठा समाजावर निशाणा साधणारा नेता नेमका कोण असू शकतो ? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply