मृत्यूला ५५ वर्षे उलटली तरी या फौजीचा आत्मा बॉर्डरचं रक्षण करतोय | Baba Harbhajan Singh | Indian Army Status
मंडळी आज 15 ऑगस्ट. सर्वप्रथम सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो जसं की तुम्ही जाणताचं जगातल्या टॉप पाच आर्मीमध्ये इंडियन आर्मीचा समावेश होतो. एक फौजी म्हणजे फक्त रोजगाराच्या अपेक्षेनं इंडियन आर्मीत भरती झालेला सैनिक नसतो तर तो देशप्रेमानं पछाडलेला एक सच्चा देशभक्त असतो. आपलं कुटुंब, नातीगोती, वैयक्तिक आयुष्य, मौजमजा असं सर्वस्व त्यानं देशाच्या सेवेत वाहिलेलं असतं. देशप्रेमाचं वारं त्याच्या धमन्यातून वाहू लागतं तेव्हा वादळवारा, पाऊस, रक्त गोठवणारी थंडी आणि अगदी मृत्यू समोर आला तरी तो त्याच्या कर्तव्यापासून मागं हटत नाही. फौजी फौजमध्ये असला काय किंवा रिटायर्ड झाला काय त्याच्या देशप्रेमात जराही कमीपणा येत नाही. देशभक्ती नसानसात भिनलेल्या अशाच एका कर्तव्यनिष्ठ फौजीची एक रहस्यमयी गोष्ट आज आपण जाणून घेणारय. बाबा हरभजन सिंग ह्ये त्यांचं नाव. असं म्हणतात की बाबा हरभजन सिंग यांच्या मृत्यूला 55 वर्षे उलटून गेलेत पण आजही भारत चीनच्या बॉर्डरवर ते त्यांची ड्युटी बजावतात. त्यांचा आत्मा तिथं रात्रीचा घोड्यावर बसून बॉर्डरवर पेट्रोलिंग करतो आणि संकटाच्या प्रसंगी भारतीय सैन्याला मदत ही करतो. तुम्ही म्हणालं आता ह्ये कसं काय शक्य आहे, मेल्यानंतर कोण सेवा कसं बजावू शकतं, तर थांबा, काळजी करू नका. स्वतः इंडियन आर्मी सुद्धा या गोष्टीला दुजोरा देते. एवढंच काय आर्मीनं बाबा हरभजन सिंग यांच्या स्मरणार्थ नथुला भागात एक मंदिर देखील बांधलंय. तिथं ही अनेक अनपेक्षित घटना घडल्याची नोंदय. एकूणचं त्या सर्व प्रकरणाचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
( Baba Harbhajan Singh | Indian Army Status | Vishaych Bhari )

आता सुरुवातीपासून आपण बाबा हरभजनसिंग यांचा इतिहास जाणून घेऊ, जसं की ते इंडियन आर्मीमध्ये भरती कधी झाले, त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं ह्ये सगळं. तर 30 ऑगस्ट 1946 रोजी सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या गुजरावाला गावात हरभजन सिंग यांचा जन्म झाला. पण पुढं जेव्हा 1947 साली आपल्या देशाची फाळणी झाली तेव्हा बाबा हरभजन सिंग यांचं कुटुंब भारतात येऊन स्थायिक झालं. लहानपणापासून बाबा हरभजन सिंग यांच्या घरी देशभक्तीमय वातावरण होतं त्यामुळं आपणही मोठं झाल्यावर देशाची सेवाच करायची ह्ये हरभजन सिंग यांनी मनात पक्क केलेलं. त्यानुसार ते बरीच मेहनत ही घेत होते. दरम्यान 1966 साली ठरवल्याप्रमाण बाबा हरभजन सिंग पंजाब रेजिमेंटमध्ये 24 व्या बटालियनचे सैनिक म्हणून भरती झाले होते. त्यावेळी भारताच्या बॉर्डरवर पाकिस्तानपेक्षा चिनी सैनिकांचा जास्त धोका सतावत होता. त्यामुळं सरकार आणि इंडियन आर्मीनं सिक्कीममध्ये जवानांच्या तुकड्या पाठवून बॉर्डरवरची सुरक्षा यंत्रणा टाईट करायचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 1968 साली बाबा हरभजन सिंग यांची यंग आणि डॅशिंग तुकडी सिक्कीम भागात तैनात करण्यात आली होती. भयंकर वादळं, पाऊस, बर्फवृष्टी आणि रक्त गोठवणाऱ्या थंडीत जवानांना आपापल्या पोस्टवर ड्युटी करावी लागत होती. त्यावेळी सैन्याच्या खाण्यापिण्याच्या सामानाची वाहतूक करण्यासाठी घोडे किंवा खेचरांचा वापर केला जात असायचा. एकदा असंच खेचरांवरून हरभजन सिंग त्यांच्या पोस्टजवळ खाण्यापिण्याच्या वस्तू वाहून नेत होते. नदीवरून प्रवास सुरू होता. त्यावेळी अचानक त्यांच्या खेचराचा पाय घसरला आणि बाबा हरभजन सिंग त्याच्यासह खाली नदीत पडले. पडताना डोक्याला जबर मार लागला आणि त्यांना वीरमरण प्राप्त झालं. पाण्याचा प्रवाह भयंकर होता त्यामुळं पडल्याबरोबर त्यांचा मृतदेह नदीतून वाहून जाऊ लागला.
( Baba Harbhajan Singh | Indian Army Status | Vishaych Bhari )
सुदैवानं ते नदीत पडतानाचं दृश्य एका सैनिकाच्या नजरेस पडलं. त्यानं तातडीनं सगळ्या तुकडीला ती बातमी दिली आणि सर्वांनी मिळून बाबा हरभजन सिंग यांचा शोध सुरू केला. तब्बल 48 तास सलग तपास करूनही हरभजन सिंग यांचं पार्थिव सापडलं नाही. भरती झाल्यानंतर फक्त दोनच वर्षात हा दुर्दैवी अपघात घडला आणि देशानं एक सक्षम जवान गमावला. सगळ्यांना त्याची मनापासून खंत वाटत होती. पुढं सैनिकांनी हरभजन सिंग यांचा शोध घेणं थांबवलं. त्यांचं पार्थिव आता मिळणार नाही असं जवळपास सगळ्यांनी मान्यच केलं होतं. दरम्यान एक आश्चर्यकारक घटना घडली. बाबा हरभजन सिंग यांच्या एका सहकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, एके रात्री त्याच्या स्वप्नात हरभजन सिंग आले आणि त्यांनी त्यांचा मृतदेह नदीच्या कुठल्या भागात अडकलाय त्याची माहिती दिली. अन धक्कादायक म्हणजे बरोबर त्यांनी स्वप्नात सांगितलेल्या ठिकाणीचं हररभजन सिंग यांचं पार्थिव मिळालं. त्यानंतर आर्मी, त्यांचे सहकारी आणि पंजाब राज्य सरकारनं त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. आता इथपर्यंत आपण एका शहीद सैनिकाचा प्रवास ऐकला असं तुम्हाला वाटलं असेल. पण खरी गोष्ट इथूनच सुरू होते. भारताच्या सिक्किम राज्याला चीनच्या तिबेट प्रांतासोबत जोडणाऱ्या रस्त्यावर एक खिंड आहे. त्याला नाथूला खिंड असं नाव देण्यात आलंय. त्या भागात चिनी सैन्यांचा वेळोवेळी हस्तक्षेप व्हायचा. त्यामुळं त्या चिनी सैन्यावर वचक ठेवण्यासाठी जास्तीच्या भारतीय सैन्याच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोस्टिंगच्या ठिकाणी मोठंमोठे बंकर्स उभे करण्यात आलेत. इंडियन आर्मीच्या जवानांचा 24 तास तिथं तगडा पहारा असतो. तर तिथं पहारा देणाऱ्या काही जवानांना त्यावेळी अनपेक्षित अनुभव आले. अनेकांना रात्रीच्या वेळी हरभजन सिंग बॉर्डरवर पहारा देताना दिसून आले. ( Baba Harbhajan Singh | Indian Army Status | Vishaych Bhari )

एक दोन नाही तर चक्क तीस चाळीस सैनिकांनी लागोपाठ तसे अनुभव आल्याचं आपल्या वरिष्ठाना सांगितलं. भारतीय सैनिकांच सोडा, खुद्द चिनी सैनिकांनी सुद्धा रात्रीच्या वेळी खेचरावर बसून बॉर्डरवर पहारा देणाऱ्या हरभजन सिंग यांना पाहिल्याचं कबूल केल्यावर आर्मीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या घटनेचा गांभीर्यानं विचार केला. त्यांच्या सहकाऱ्यांनी हरभजन सिंग यांच्या बंकरला एका मंदिराचं रूप दिलं आणि हरभजन सिंग यांची पूजा ही चालू केली. काही काळानंतर तिथं आर्मीनंच एक भव्य मंदिर बांधलं ज्याला आज ‘बाबा हरभजन सिंग मंदिर’ म्हणून ओळखलं जातं. ते मंदिर सिक्कीमच्या गंगटोकमधील जेलेप्ला दर्रे आणि नाथुला दर्रे भागाच्या दरम्यान 13000 फूट उंचीवरय. त्या मंदिरात बाबा हरभजन सिंग यांचा एक फोटो आणि त्यांचं ड्युटीचं सामान ठेवलेलंय. आज अनेक लोकं तिथं दर्शनासाठी जातात. त्या मंदिराजवळ 24 तास काही सैनिक पहारा देतात. तिथं ड्युटी करणाऱ्या सैनिकांच्या म्हणण्यानुसार, बाबा हरभजन सिंग आज सुद्धा आपली ड्युटी बजावतात या घटनेचा एक महत्वाचा पुरावा म्हणजे त्यांची कपडे, बूट आणि झोपायची चादर. कारण त्यांचे कपडे, बूट रोज संध्याकाळी धुवून मंदिरात ठेवलं तरी सकाळी उठल्यानंतर त्यावर चिखल लागलेला दिसतो. एवढंच काय, त्यांचं अंथरूण ही चुरघळलेलं दिसतं. म्हणूनच की काय आज 55 वर्षे उलटून सुद्धा इंडियन आर्मीनं त्यांचा पगार बंद केलेला नाहीये. त्यांच्या पगाराची रक्कम त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवली जाते. मागच्या काही काळापर्यंत बाबा हरभजन सिंग यांना आर्मीच्या नियमांनुसार वार्षिक सुट्टी ही मंजूर केली जायची. सुट्टीच्या दिवशी ते घरी जायचे अशी सगळ्यांची समजूत होती. त्यांच्यासाठी रेल्वेचं तिकीट बुक करून एक सीट कायम ट्रेनमध्ये मोकळी ठेवली जात असायची. दोन तीन सैनिकांना त्यांचं सामान घेऊन गावी पाठवलं जायचं.
( Baba Harbhajan Singh | Indian Army Status | Vishaych Bhari )
पण नंतर गावातल्या काही लोकांनी त्याला ही सगळी अंधश्रद्धा आहे असं समजून आर्मीच्या निर्णयाला विरोध केला तेव्हापासून बाबा हरभजन सिंग यांची सुट्टी कायमस्वरूपी कॅन्सल केली गेली असं म्हणतात. आता बाबा हरभजन सिंग 12 महिने भारत चीन बॉर्डरवर आपलं कर्तव्य बजावत देशसेवा करत असतात. त्यांच्या मंदिराजवळ तैनात झालेले सैनिक म्हणतात की, त्यांचा आत्मा भारतीय जवानांना चिनी सैनिकांच्या बाजूने होणाऱ्या आक्षेपार्ह हालचालीची आधीच सूचना देतो. जवान सांगतात, तुमचा विश्वास असो वा नसो, चीनी सैनिकांना देखील बाबा हरभजन सिंग यांच्या अस्तित्वावर पूर्ण विश्वासय. म्हणूनच भारत आणि चीन यांच्यादरम्यान होणार्या प्रत्येक ध्वज सभेमध्ये बाबा हरभजन सिंग यांच्या नावावर एक रिकामी खुर्ची ठेवली जाते, जेणेकरून ते त्या सभेला उपस्थित राहू शकतील. बरेचजण बाबा या घटनेला अंधश्रद्धा समजतात पण त्यापेक्षा जास्त लोकांना बाबा हरभजन सिंग यांची गोष्ट खरी वाटते. आणि म्हणूनच मृत्यूनंतर ही ज्यांना देशसेवेचं अमरत्व मिळालंय अशा बाबा हरभजन सिंग यांना विषयच भारी टीमकडून मानाचा मुजरा. पण त्यांची गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटलं त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. जर हा लेख तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथही आम्हाला फॉलो करायला विसरू नका. जय हिंद.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply