Jagdeep Dhankhar : भारत अमर्याद संधींचा देश; उपराष्ट्रपती जगदीप धनखड, विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

छत्रपती संभाजीनगर : आधुनिक भारतात विकासाच्या अमर्याद संधी आहेत. त्यामुळे जगभरातून गुंतवणुकीचा ओघ आहे. या संधी युवक-युवतींनी ओळखाव्यात आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे.

कर्तबगार तरुणांच्या बळावर येत्या २०४७ पर्यंत म्हणजेच स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात भारत विकसित देश म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभ शनिवारी (ता.२२) नाट्यगृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, खासदार डॉ. भागवत कराड, कुलगुरू डॉ. विजय फुलारी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, की हा ‘शिक्षांत’ नव्हे, ‘दीक्षांत सोहळा’ आहे, याची जाणीव ठेवा. शिक्षण हे आयुष्यभर सुरूच राहणार आहे, हे लक्षात ठेवून जीवनात सातत्याने ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. माजी विद्यार्थी म्हणून विद्यापीठाच्या विकासात योगदान द्यावे. भारतात प्रगतीच्या अनेक संधी असल्याने जगाचे लक्ष आपल्याकडे आहे. विद्यापीठाने या संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोचवाव्यात.

राज्यपाल यांनी दीक्षांत संदेश दिला. ते म्हणाले, की जीवनातील विविध क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी आज तुम्हाला पदवी प्रदान करण्यात येत आहे. आपल्या शिक्षणाचा आणि त्यातून प्राप्त ज्ञानाचा देशाच्या विकासासाठी, समाजाच्या भल्यासाठी उपयोग करावा. कुलगुरू डॉ. फुलारी यांनी प्रास्ताविक केले. तर, सूत्रसंचालन डॉ. मुस्तजीब खान यांनी केले.

कार्यक्रमापूर्वी उपराष्ट्रपतींच्या हस्ते पी.एम. उषा मेरू योजनेअंतर्गत मंजूर चार इमारतींचे भूमिपूजन करण्यात आले. ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत नाट्यगृह परिसरात रोपे लावण्यात आली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दीक्षांत मिरवणुकीचे नेतृत्व करत राजदंड मंचावर स्थापित केला.

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा १३, मानव्यविद्या १३, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र ९ व आंतरविद्या शाखेतील ५ पदवीधरांच्या पदव्यांसंदर्भातील वाचन अधिष्ठाता डॉ. महेंद्र सिरसाठ, डॉ. संजय साळुंके, डॉ. वीणा हुंबे व डॉ. वैशाली खापर्डे यांनी केले. संपूर्ण समारंभात ४० विद्यार्थी व काहींचे कुटुंबीय उपस्थित होते. उपस्थिती वाढवण्यासाठी ऐनवेळी काही अधिकाऱ्यांनी धावपळ केली. नाट्यगृहात प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यासह विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, शिक्षक, अधिकारी उपस्थित होते.

दोन तास पाहावी लागली वाट

नियोजनानुसार दीक्षांत सोहळा दुपारी ३.२० वाजता सुरू होणार होता, प्रत्यक्षात सोहळा ४ वाजता सुरू झाला. कडक सुरक्षा नियम, पदवी वितरणातील भेदभाव आणि उपस्थितांसाठी करण्यात आलेल्या अडचणींमुळे कार्यक्रमाबद्दल विद्यार्थी, प्राधिकरण सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. कडक नियम केल्याने अनेकांना माघारी परतावे लागले.

मात्र, नंतर सभागृहात नातेवाईक, विद्यार्थ्यांना बोलवण्याच्या तीन घोषणा झाल्या. नाट्यगृह परिसरात पावणेतीनशे पोलिस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त होता. ४० विद्यार्थी, ५० मिनिटांत दीक्षांत समारंभ पीएचडीसाठी बोलावण्यात आलेल्या काहीच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मान्यवरांच्या हस्ते पदवी देण्यात येईल, अशी चर्चा झाल्याने उर्वरित विद्यार्थ्यांना हा निर्णय अन्यायकारक वाटला.

यावेळी पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, तसेच डॉ. मुस्तजीब खान यांनी मध्यस्थी करून विद्यार्थ्यांना शांत केले. पन्नास मिनिटांच्या पदवीधारकांच्या दीक्षांत समारंभात कुणालाही मान्यवरांच्या हस्ते पदवी वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

Comments (0)
Add Comment